Saturday, January 31, 2015

श्री उत्तम कांबळे यांचे भाषण 



मी आज इथे आपल्यासमोर ज्यांच्यामुळे उभा आहे त्या फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो.
केवळ माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीचंच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि विचारांचं ठाणं असलेल्या या शहरातून पहिल्यांदा रेल्वे तर धावलीच; शिवाय पहिल्यांदा काही पुरोगामी क्रांतिकारी विचारही या शहरातून बाहेर पडले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिलं साहित्य संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. तेव्हा अध्यक्ष होते, रा. श्री. जोग आणि आता महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव होतानाही संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. या संमेलनाचा अध्यक्ष आहे उत्तम कांबळे. जोग ते उत्तम कांबळे आणि मध्ये १९८८ ला नाशिकचेच वसंतराव कानेटकर अशा या लांबलचक प्रवासात बरंच वारं वाहून गेलं. या भूमीत उगवलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना अंकुरही फुटले. अध्यक्ष झालेला हा उत्तम कांबळे कोण आणि कुठला याविषयी नेहमीच उत्सुकता आणि चर्चा होत राहिली आणि ती सारीच मला आनंददायी वाटली. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे, की नाशिकचा आहे मी? खरं तर मी सा-याच ठिकाणांचा आहे. मी वैश्विक आहे. भाकरीची शिकार करण्यास कोण्या एकेकाळी मी बाहेर पडलो. शहरा-शहरांमध्ये गेलो. या सा-याच शहरांनी माझ्या श्वासांना बळ दिलं. मुळांना रुजण्यासाठी भुसभुशीत जमीन दिली. लिहितं होण्यासाठी नद्या-नाल्यांचा काठ दिला. जसा मी नाशिकचा, तसा कोल्हापूरचा, जसा सांगलीचा तसा आता ठाण्याचाही… मी या सा-यांचा म्हणूनच विश्वाचा… भाकरीनं आणि तिच्यासाठी झालेल्या लढाईनं मला सा-यांचा बनवलं. मी या सा-या शहरांचा, प्रदेशांचा मनापासून आभारी आहे. हे जग आणि इथला माणूस कधी स्थिर नव्हता. निसर्गातून बाहेर पडल्यापासून तो स्थलांतरच करत राहिला आहे. कधी भाकरीसाठी, तर कधी भाकरीच्या चंद्रासाठी… कधी विकास पावण्यासाठी तर कधी विकासाचीच पेरणी करण्यासाठी… या स्थलांतराचा अर्थ नीट समजून घेतला नाही, की युद्ध होतात आणि मी तर युद्ध नको; बुद्ध हवा म्हणणारा आहे. फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी रुजलेल्या भूमीत स्वत:साठी घरटं बनवणारा आणि साहित्यात माणसासाठी काही शब्द कोरणारा आहे. काही शब्द बोलणारा आहे. आज मी इथं आपल्यासमोर, आपल्या छायेत उभा आहे, ते याचसाठी.
ठाण्याशी अगदी अलीकडं आणखी एका कारणानं माझं अतिशय भावनिक नातं जोडलं गेलं आहे. माझ्या मानलेल्या बापाचे म्हणजे नारायण सुर्व्यांचे शेवटचे काही श्वास याच शहरानं वाढवण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील लहान-मोठ्यांनी जमेल ती मदत केली या बापाला. महाराष्ट्रही मदत करीत होताच. याच शहरात माझ्या बापानं अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत असताना म्हणजेच बेशुद्ध अवस्थेतही न दिसलेलं कविसंमेलन भरवलं होतं. आयुष्यभर एक महाकविताच बनलेल्या सुर्व्यांनी अतिदक्षता विभागातच मला एक प्रश्न विचारला होता, ‘ का रे, झालास का अध्यक्ष? ‘ मी तेव्हा निरुत्तर होतो. निवडणुकीच्या चक्रव्यूहात तेव्हा लढत होतो. मला माहीत नव्हतं, या लढाईचा फैसला काय होणार आहे? जेव्हा तो जाहीर झाला तेव्हा तो ऐकायला हा बाप नव्हता. खरं तर याच बापानं मला त्याच्या भल्या मोठ्या बापाच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या ओटीत टाकलं होतं. या थोरल्या बापानंही मला दहा-अकरा वर्षे पोरासारखं बाळगलं. गोदेकाठी तपस्वी बनून तळपणारा हा थोरला मोठा बापही आज हयात नाहीय. याच काठावर बसून विद्रोहाला धार लावणारा बाबूराव बागूल नावाचा आणखी एक बापही नाहीय. मी अनेक वर्षं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, रा. ग. जाधव, रावसाहेब कसबे, भास्कर भोळे आदी अनेकांनी घडवलेल्या प्रबोधन चळवळीचं बोट धरून चाललो. एका मोठ्या धर्मचिकित्सेच्या कार्यात भालचंद्र पडके यांनी मला दिलेली ऊर्जा घेऊन चाललो. माझ्या दृष्टीनं ही सारी बापमाणसं होती. आता यातील बहुतेक सारी काळाआड गेली आहेत. एक मोठी अनामिक पोकळी घेऊन मी उभा आहे, असं वाटतंय… पण साहित्याच्या उत्सवासाठी झालेली आपल्या सर्वांची गर्दी आणि तिच्या असंख्य सावल्या पाहून मी पुन्हा सनाथ झाल्यासारखं वाटतं आहे.
मला माहीत आहे, की ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथं मी पोचण्यापूर्वी ८३ अध्यक्षांच्या भल्यामोठ्या दिंड्या गेल्या. त्यांच्या लांबलचक सावल्या आणि त्यांची पाऊलचिन्हंही दिसत आहेत. विचाराचं एक भलंमोठं मंथन झालं आहे इथं… या सर्वांचा एक अनामिक सुगंध दरवळतो आहे इथं. या सुगंधामध्ये अनेक ऋषितुल्य माणसं आहेत. या सर्वांचा अभिमान वाटतो आहे मला. या सर्वांनी इथं आपल्या प्रतिभेच्या पंखांना मोकळं केलं होतं. मराठीचे पोवाडे गायले होते. तिच्या वाटचालीची चिकित्साही केली होती. तिच्या मार्गातील गतिरोधकही दाखवले होते. काहींनी जागल्याची भूमिका करत आपल्या हातात लाल कंदीलही धरले होते. या सर्वांनी चालेली वाट आणखी रुंद व्हावी. फुले,
शाहू, आंबेडकरी, विद्रोही, ग्रामीण, स्त्रीवादी अशा सर्व वाटा आणि तिथं घुमणारे एल्गार, या वाटेवर यावेत… या वाटंनंही मोठ्या आनंदानं या सर्वांचं त्यांच्या एल्गारासह स्वागत करावं, असंही मला वाटतं आहे. माझा तसा नम्र आग्रहही आहे. माझ्या प्रवासाचा प्रारंभ जग बदलण्याच्या घोषणांनी दुमदुमून गेलेल्या याच वाटांवरून झाला आहे. त्याचाही मला गर्व वाटतो आहे.
आपल्या वाटचालीचं ८४ वं पाऊल टाकणारं हे संमेलन आता उत्तर आधुनिकतेत उभं आहे. त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणात कधी नव्हे एवढ्या मोठ्या आवाजात विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्फोट होत आहेत. चंद्रावर-मंगळावर स्वा-या करण्यासाठी माणसांच्या आणि यंत्रांच्या झुंडी एक-एक पाऊल पुढं टाकताहेत. जिवांचे क्लोन करण्यासाठीच्या अर्जांचाही जगाच्या कचेरीत ढीग साचतो आहे. सुपर सुपर एक्स्प्रेस हायवेवरून जग धावतं आहे. शेषाच्या मस्तकावरचं हे जग, अण्णाभाऊंनी राबणा-यांच्या तळहातावर आणलं आणि संगणकाच्या क्रांतीनं ते पडदा नावाच्या आपल्या छोट्याशा छाताडावर आणलं आहे. नवनवे शोध, संशोधनं आणि प्रतिनिसर्ग बनवण्यासाठी माणसाच्या सुरू असलेल्या लढाया, या सा-यांमुळे जग चालण्याऐवजी धावतं आहे. माणसं धावताहेत… त्यांच्या गावांसह धावताहेत, तर काही जण गावं सोडून धावताहेत. तोंडातून फेस आणि आतडी बाहेर पडेपर्यंत धावताहेत… स्वप्नांसह धावताहेत… धावता धावता खाली पडणा-या स्वप्नांचे तुकडे मुठीत घेऊन धावताहेत. प्रचंड वेगानं धावणारं आणि धावण्यालाच जगणं मानणारं असं एक आगळंवेगळं जग प्रथमच आपल्या अवतीभोवती अवतरलं आहे. मी स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेलो आणि सतत धावत अस्थिर होत असलेल्या जगाचा एक प्रतिनिधी आहे. नव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी आधुनिकतेत मीही उभा आहे. खरं तर मी स्वत:च एक नवं युग आहे आणि या नव्या युगानं निर्माण केलेली धगही आहे. या युगानं माझ्या हातातला कागद कमी कमी करत आणला असला, तरीही मोठ्या कष्टानं कागदाऐवजी काळजावर गोंदवलेले ओंजळभर शब्द घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे.
मी आयुष्याचा प्रवास सुरू केला तेव्हा मोटेची गाणी माझ्या पाठ्यपुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं किर्लोस्करांच्या इंजिनानं मोटेची जागा घेतली होती, हेही खरं आहे. किर्लोस्करवाडीत कंदिलाची काच तयार करणारा कारखाना सुरू होता, हे जसं खरं आहे तसं कोयनेतील वीज घेऊन चकाकणा-या बल्बनी कंदिलाची जागा घेतली होती, हेही खरं आहे. ‘ आरं घरोटं घरोटं ‘ म्हणणाऱ्या बहिणाबाईंची गाणी ओठांवर आणि पुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं काही तासांत मणभर ज्वारीचं पीठ बाहेर टाकणारी यंत्रंही आली होती, हेही खरं आहे. ‘ उठा उठा चिऊताई ‘ ही कुसुमाग्रजांची कविताही मी पाठ करत होतो आणि त्याच वेळेला बंगल्यातील शोकेसमध्ये प्लास्टिकच्या चिमण्याही पाहत होतो. नवं आणि जुनं यांच्यातील घासाघाशी पाहत मी अशा बिंदूवर येऊन पोचलो, की जेथे जुन्या शतकाच्या कॅलेंडरवरचं शेवटचं पान गळून पडलं आणि नव्या शतकाचं नवं कॅलेंडर सुरू झालं. माझा ‘ अस्वस्थ नायक ‘ येथेच जन्माला आला. मी स्वातंत्र्यानंतरचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून दीर्घकाळ चालत राहिलेल्या चळवळी मात्र पाहत आलो आहे. पाण्यासाठी, उजेडासाठी, समतेसाठी, हक्कासाठी, वेतनासाठी, स्त्रीमुक्तीसाठी आणि एवढंच नव्हे, तर मेल्यानंतर गाडण्यासाठी जागा मिळावी म्हणून सुरू असलेल्या चळवळी पाहत आलो आहे. आणखी ब-याच चळवळी आहेत. माणसाची जागा आता यंत्रानं ब-यापैकी घेतली होती आणि हे यंत्र माणसाला स्वत:च्या गतीवर धावायला लावत होतं. धावल्याशिवाय जगता येत नाही, हा माझ्या पिढीतील आणि आमच्या पोटी जन्माला आलेल्या पिढीचा सुविचार बनतो आहे. या धावण्याचीच पुढं स्पर्धा झाली. मी माणसाचा नागरिक झालो आणि आता नागरिकाचा स्पर्धक झालो. मी एक स्पर्धक, तू एक स्पर्धक, ती एक स्पर्धक आणि ही पृथ्वीच जणू एक स्पर्धक… माझा सारा भोवताल ज्या प्रचंड गतीनं धावतोय, त्या गतीनं माझ्या भोवतालच्या पुस्तकाची पानं हलताना दिसत नाहीत. दोन-पाच दशकांपलीकडं आपलं सारं साहित्यही लढायांनी भरलं होतं. आपले साहित्यिक या लढायांशी जोडले होते. भाकरी मिळवण्यासाठी लढाई होती, जात चोरण्यासाठी लढाई होती आणि विद्रोह होता. नवं विद्यापीठ उभारण्याची आणि नवी सनद लिहिण्याची लढाई होती. टाटाला सवाल विचारला जात होता. गर्जा जयजयकार होता आणि स्वातंत्र्यदेवतेस विनवणी करणारा स्वातंत्र्याचा लेखाजोखाही होता. लिहिणारेही लढत होते आणि लढणारेही लिहीत होते. पुढं तर हरणारेही लिहायला लागले. आपल्या जखमांचा हिशेब मागायला लागले आणि काही काही वेळा जखमांच्या माळा गळ्यात मिरवू लागले. दलित, आदिवासी, भटके, कामगार, श्रमिक या सर्वांच्या लढाया साहित्यात दिसू लागल्या. हे सर्व घडत असतानाच साता समुद्रापार तयार झालेली जागतिकीकरणाची लाट आपल्यापर्यंत पोचली. ती आपण थोपवू, असं काहींना वाटत होतं, तर ती आपल्यापर्यंत पोचणारच नाही, असंही काही जण सांगत होते. काही जण लाट पोडण्याची, तिच्या चिंध्या-चिंध्या करण्याची भाषा करत होते. यापैकी घडलं काहीच नाही आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण कसं सहभागी झालो, हे भल्याभल्यांनाही कळलं नाही. जागतिकीकरणानं आपलं मन, मेंदू, मनगट, घर, वस्तू, स्वप्न, संवेदना या सा-या सा-यांना घेरलंय.
पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा केव्हा नवे प्रवाह येतात, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी वा विरोधासाठी वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची, साहित्याची निर्मिती होत असते. रशियातला साम्यवाद जेव्हा कोलमडायला लागला होता, तेव्हा एन्ड ऑप आयडॉलॉजी (तत्त्वज्ञानाचा शेवट) हे डॅनियल बेल यांचं पुस्तक आलं. जगाला तत्त्वज्ञानाची आता गरज नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पुढं जगाला तत्त्वज्ञानाचीच नव्हे, तर इतिहास-भूगोलाचीही गरज असणार नाही, असं सांगणारी अंताची (एन्ड) एक मालिकाच सुरू झाली. द एन्ड ऑप हिस्ट्री अॅण्ड द लास्ट मॅन (इतिहासाचा अंत आणि शेवटचा माणूस) प्रान्सिस फुकुयामा, आय सायबर्ग-केवीन वारविक, द एन्ड ऑप फेथ (श्रद्धांचा अंत) – सॅम हॅरिस, द एन्ड ऑप सेक्स (सेक्सचा अंत)- जॉर्ज लिओनॉर्ड, असे अनेक ग्रंथ आले. आता सारं काही संपणार आणि जागतिकीकरणच शिल्लक राहणार, असाच हाकारा दिला जात होता. जागतिकीकरणात फक्त बाजारपेठा आणि त्यातील वस्तू, नफा-तोटाच शिल्लक राहील, असं सांगण्यात येत आहे.
जग एका मोठ्या पेचप्रसंगातून जातं आहे. या पेचप्रसंगात आपलं मराठी साहित्य कुठं उभं आहे, काय घेऊन उभं आहे, कसं उभं आहे आणि कोणासाठी उभं आहे हे पाहणं ओघानंच येत असतं. आपल्या पर्यावरणात आज जगण्यासाठीच्या लढाईतून रोज हजारो माणसं बाहेर फेकली जात आहेत. काही आत्महत्या करत आहेत. स्पर्धेला घाबरून शालेय जीवनातच आत्महत्या करत आहेत. काहींना मातेच्या गर्भातच मृत्यू मिळतो आहे. अशा वेळी मी कधी-कधी चिडून म्हणतो, हे जग कुणाचं? जगणा-यांचं की मरणा-यांचं? विकासाचा दर डबल आकड्यात जातानाही मृत्यू आणि विकासाचा आकडा घसरतानाही मृत्यू, असं काहीतरी विलक्षण चित्र आपण सारेच पाहतो आहोत. जग बदलत असतं. हे बदलतच राहणार आहे; पण माणूसघाणं जग निर्माण व्हावं हे काही बरोबर नाही. गुलाम जन्माला घालणारं नवं जग निर्माण व्हावं हेही काही बरोबर नाही.
आपण जागतिकीकरणाला विरोध करतो म्हणजे नेमकं काय करतो, हेही समजून घ्यायला हवं. आपला यंत्राला किंवा आधुनिकतेला विरोध नाही; पण त्यातून जन्माला येणा-या नव्या विषमतेला आणि जीवघेण्या स्पर्धेला मात्र विरोध असायला हवा. तंत्रज्ञानाचा वापर करून जगणा-या आणि हरणा-या अशा दोन जाती तयार करण्याला विरोध असायला हवा. नवे गुलाम जन्माला घालण्याला आणि यंत्राच्या मदतीनं नवा वसाहतवाद तयार करण्याला आपला विरोध असायला हवा. आपलं साहित्य हे सारं मुकाटपणे, त्रयस्थपणे पाहत राहणार, की हालचाल करणार आहे?
जागतिकीकरण पकडायला आणि त्याची उकल करायला आपण थोडाफार उशीरच केला, असं माझं स्वत:चं मत आहे. काही कविता आणि एखाद-दुस-या कादंबरीचे उपवाद वगळता आपण साहित्यात याविषयी फार काही करू शकलो नाही. यांत्रिकीकरण, मॉल, सेझ यांसारख्या गोष्टी आणि त्याच्या परिणामावर काहींनी लिहिलं; पण हे पुरेसं नाही. अन्य भाषांमध्ये जागतिकीकरणाचे बरेवाईट पैलू मोठ्या प्रमाणावर प्रकट होत आहेत. मॉलवर कादंब-या येत आहेत आणि उत्तर आधुनिकतेनं निर्माण केलेल्या मायावी जगाचे बुरखे फाडत आहेत. आपण काळाबरोबर चाललो नाही, आपल्या शब्दांनी काळ पकडला नाही, तर माणूस आणि साहित्य म्हणूनही आपण मागं पडू, असं मला वाटतं. जागतिकीकरण हे आता केवळ एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या देशाचं नव्हे; सा-या नव्या जगाचं वास्तव झालं आहे. ते समजून घेणं जसं महत्त्वाचं आहे. तसं या जगात सर्वांनाच अवकाश कसं मिळेल, हे पाहणं आणि आपल्या साहित्यात त्याला अवकाश देणंही महत्त्वाचं आहे. संपर्क साधनांची महाक्रांती होत असतानाही आपल्याकडचे लाखो-कोट्यवधी लोक आपण रेंजबाहेरच आहोत, असं टाहो पोडून का सांगतात ? विकासाच्या रेंजमध्ये असणा-यांमधील अंतर का वाढतं आहे ? किंवा जाणूनबुजून ते का वाढवलं जातं आहे, याचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी आपली प्रतिभा, सृजन आणि लेखणी वापरायला हवी. हे मरणाचे नवे पट्टे, हे भकासपणाचे नवे पट्टे, माणसाला रंगहीन करणारे पट्टे; आपला साहित्यिक पाहणार आहे की नाही? ते त्यांनी पाहायलाच हवेत, असा माझा आग्रह आहे.
साहित्य आणि भूमिका असा शब्द उच्चारला, की अनेकांच्या भुवया आजही उंचावतात हे मला कधीपासून माहीत आहे. याच शब्दावरून कला, कलेसाठी की कला जीवनासाठी? असे झडलेले वाद मी कितीतरी वर्षांपासून ऐकतो आहे. मला स्वत:ला या वादात शिरायचं नाही. त्यासाठी अनेक वादकरी आपल्याकडे आहेत. ते त्यांचं-त्यांचं काम करीत राहतील! तर मी भूमिकेविषयी, कलेविषयी बोलत होतो. मला स्वत:ला कला खूप आवडते आणि त्यापेक्षा ती जेथून जन्माला येते ते जीवन तर सर्वांत जास्त आवडतं. कलात्मकता लाभलेलं साहित्य वाचायला, पाहायला, परिणाम करायला बरं वाटतं; याविषयीही माझं दुमत नाही. पण तरीही या दोहोंमध्ये एक अदृश्य रेषा असतेच. मी अनेकदा आदिवासी पाड्यांवर त्यांच्या झोपड्यांमध्ये जात असतो. त्यांच्या भिंतींवर मस्तपैकी नक्षी असते. रंगकामही असतं. चित्रंही चांगली असतात. पाडे दारिद्र्याचे ओझे वाहणारे असले, तरी अनेक झोपडीवजा घरांच्या भिंती कलात्मक वाटायला लागतात. पण वास्तव हे आहे, की आदिवासींनी ज्या झोपड्या बांधल्या त्या निवाऱ्याची मूलभूत गरज भागविण्यासाठी, जगण्यासाठी. नंतर या साऱ्या जगण्यातून स्वाभाविकपणे कला आल्या. मी माझ्या आजीच्या मांडीवर पहाटे डोकं टेकवून अनेक वेळा जात्याची घरघर ऐकत झोपायचो. आजी अगोदर जातं साप करायची. त्याचा खुंटा बळकट करायची. धान्यानं भरलेलं सूप जवळ ओढायची. मग मूठभर दाणं जात्याच्या तोंडात टाकायची. पोटातली आतडी तोंडात येईपर्यंत जातं ओढायची. मग हळूहळू जाडं-भरडं आणि नंतर मऊ पीठ बाहेर पडायचं. जात्याची घरघर वाढली, की त्यातून संगीत बाहेर पडायचं. ते ऐकून मलाही खूप झोप यायची. जात्यातून बाहेर पडणारं संगीत इतरांप्रामाणेच मलाही खूप आवडायचं. नंतर मी एरंडासारखा वाढत गेलो आणि कळलं, की माझी आजी संगीतासाठी नव्हं, तर पिठासाठी जातं ओढायची. जगण्यासाठी जातं ओढायची. जातं ओढणं ही तिच्या जगण्याची एक लढाई होती. दुर्दैवानं आपण पिठाऐवजी, संगीतावर आणि दारिद्र्यानं भरलेल्या घरांऐवजी भिंतीवरल्या चित्रांवरच अधिक बोलत आलो.
माणसाच्या जगण्याला जसं एक प्रायोजन असावं लागतं, तसं साहित्यालाही एक प्रायोजन असतं आणि असायलाच हवं, यासाठी मी स्वत: आग्रही आहे. साहित्याला प्रायोजनच नसेल तर त्यानं काय करायचं? प्रायोजन हेच साहित्याला चालायला, बोलायला, काही करायला लावतं. प्रायोजन साहित्याचा कणा असतं. भूमिका त्याची कणा असते. कणा असलेलं साहित्य खूप प्राभावी ठरतं. ते केवळ ओठांवरच गुणगुणत राहत नाही, तर काळजात प्रावेश करतं. हिंदोळे निर्माण करतं. लाटा निर्माण करतं. लाटा धडकायला लागल्या, की व्यवस्था हलायला लागते. नवं जग, नव्या माणसासाठीची ती हाक असते. साद असते. माणसासाठी जागा करायची असेल तर साहित्यिकाला भूमिका घ्यावीच लागते. अलीकडच्या दशकात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. माणुसकीच्या झाडालाच माणसाची मुंडकी लटकण्याच्या घटना घडल्या; पण आपण स्वत:लाच प्राश्न विचारायला हवेत, की त्या वेळी आपल्या साहित्याला भूमिका होत्या का? ‘ ग्लोबल वॉर्मिंग”च्या काळात सारी पृथ्वीच होरपळत असेल, करपत असेल तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? लोकशाहीच्या अंगावरची एक-एक वस्त्रं गळून पडण्याच्या काळात आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? नद्या-नाले, डोंगर, जंगले धनिकांच्या सात-बारावर जात असतील तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? स्त्रीचं मोठ्या गतीनं वस्तूतः रूपांतर होत असेल तर भूमिका कोणती असेल? आणि खैरलांजी रोखण्यासाठी साहित्यिकांची भूमिका कोणती असेल? मला ठाऊक आहे, की अनेक जण असं म्हणतील, की सारे प्रश्न निखळ कलेच्या आड येतील. पण मला त्याची पर्वा नाही. कारण साहित्य माणसाच्या बाजूचंच असतं, यावर माजी निखळ श्रद्धा आहे. मी सांगलीच्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असताना, गावाकडचं एक चित्र मांडलं होतं. तेच पुन्हा मांडण्याची इच्छा आहे. पुनरावृत्तीचा आरोप मान्य करून ते मला मांडायचं आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, मला गावाकडच्या मोटेची गोष्ट आठवते. इथं बसलेल्या अनेकांना आठवत असेल, गावाकडं पूर्वी मोटेला बैल जुंपून विहिरीतलं पाणी पाटात आणि पाटातलं शेतात सोडलं जायचं. जेव्हा मोट विहिरीत बुडायला हवी असते तेव्हा बैल उलटं-उलटं म्हणजे विहिरीच्या दिशेनं चालू लागतो. जेव्हा मोट भरते तेव्हा ती पाटापर्यंत आणण्यासाठी बैल सुलटं म्हणजे नाकासमोर चालू लागतो. दिवसभर त्याची ही एक कष्टदायी कसरत चालू असते. मोटेचं पाणी पाटात पडतं तेव्हा त्याचा आवाज कोणता, जलध्वनी कोणता यावरची चर्चा गाजायला लागते. जलध्वनी खळखळ, खुळखुळ की सळसळ यावर वाद झडतात. त्यासाठी शब्दही खर्च होतात. होऊ देत बापडे! मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. दुसरीकडं मोट ओढून-ओढून ज्या बैलांचा खांदा सुजतो, सुजून फुटतो, त्याच्या पाठीवर, पोटावर, चेह-यावर रक्त ओघळायला लागतं. यातील रक्ताच्या एखाद्या थेंबावर तरी आपण कथा-कविता लिहिणार की नाही, हा माझा साधा प्राश्न आहे. शब्दानं बैलाच्या जखमेवर पुंकर घालणं म्हणजे जीवनाशी सलगी करणं आहे. युद्धाशी सलगी करणं आहे. पाण्याचा आवाज आणि रक्ताचा थेंब यापैकी निवड करायची झाल्यास मी स्वत: बैलाच्या बाजूनं उभा राहीन. आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.
आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.
जागतिकीकरणाची चाहूल लागत होती तेव्हा जागतिकीकरणाचे वकील कोणती-कोणती आश्वासनं देत होते आणि कोणता जाहीरनामा जाहीर करत होते? राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याला मागं पाडेल असा जाहीरनामा होता, आता हेही थोडंसं आठवूया. पृथ्वीवरच्या सर्वांना स्वच्छ पाणी आणि आरोग्य मिळणार. चांगली हवा मिळणार. सर्वांना शिक्षणाचा हक्क लाभणार. वस्तूंचा मुबलक पुरवठा होणार. प्रात्येक मनगटाला काम मिळणार. सामाजिक, धार्मिक विषमता कमी होणार. माणसाचं मूल्य वाढणार, ज्ञानाचे स्पोट होणार, कुणाला कोणत्याही स्पधेर्त भाग घेता येणार इत्यादी. इत्यादी. या घोषणा, ही आश्वासनं, या हमी ऐकून सामान्य माणूस हरखून गेला होता. विकास मोजता यावा यासाठी तोही नवी परिमाणं शिकत होता. आकडे पाठ करत होता. स्वप्नांच्या ढिगाऱ्यावर बसला होता. आयुष्य कुरतडणाऱ्या जुन्या प्राश्नाचं दहन होईल आणि नवं जग येईल असं काय-काय तो बघत होता.
जागतिकीकरण स्थिरस्थावर झालं तेव्हा आपण काय पाहतो आहोत? विकासाचा दर वाढला. वस्तूंचं उत्पादन वाढलं. ज्ञान-तंत्रज्ञानाचा स्फोट झाला. हे सारं सारं खरं आहे; पण त्यातून एक वेगळाच समाज निर्माण झाला. विशिष्ट वर्गाचाच विकास वाढत राहिला. एकदिशा विकास होत राहिला. त्याचे लाभ घेणाराही विशिष्ट वर्ग तयार झाला. जुनी दु:खं कायम राहून नवी दु:खं तयार झाली. संस्कृतिसंघर्ष कमी होण्याऐवजी तो वाढला. धर्माच्या, देवाच्या नावानं जागोजागी स्फोट होऊ लागले. कोणी टॉवर उडवलं. कुणी रेल्वे उडवली, तर कोणी मनुष्यजात उडवण्याचा प्रायत्न करतोय. अध्यात्माची एक प्राचंड बाजारपेठ झाली. कोट्यवधी पुस्तकं आणि मोजता येणार नाही एवढी उलाढाल त्यातून बाहेर पडते आहे. मूलतत्त्ववाद गोंजारणा-या फौजाच्या फौजा तयार झाल्या. त्या समूहावर आणि शासनावरही हल्लाबोल करू लागल्या. मुंबई-मालेगावातही आपण असे हल्ले पाहिले आहेत. त्यात बळी गेलेल्यांच्या किंकाळ्या अजूनही आपल्याभोवती घुमत आहेत. नव्या व्यवस्थेनं वस्तूंची बाजारपेठ जशी वाढवली तशी अध्यात्माच्या बाजारपेठेलाही चालना दिली. अध्यात्मालाही नखं फुटली. त्यानं समाजाला आणि मूलभूत स्वातंत्र्यालाच कुरतडायला सुरुवात केली. कधी कुणाच्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावतील आणि स्फोटाचं रूप घेऊन बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. साहित्यिकांच्या लेखण्यांवरही मूलतत्त्ववाद आक्रमण करत आहे. जगभरात अशा अनेक घटना घडत आहेत. घडल्या आहेत. जागतिकीकरणात संस्कृतिसंघर्ष कमी होतील आणि वैश्विक खेड्यात सारे गुण्यागोंविदानं नांदतील, असंही एक स्वप्न ठेवण्यात आलं होतं. भूगोल आकसेल. इतिहास अदृश्य होईल. तत्त्वज्ञान संपेल आणि संपर्कसाधनांच्या जोरावर नवी क्रांती करणारा माणूस सा-या भेदाभेदांतून मुक्त होईल, असंही सांगण्यात येत होतं. प्रत्यक्ष तसं घडलेलं नाही. माणूस स्क्रीनमेकरही होतो आणि स्क्रीनसेवरही होतो. मला वाटतं, आजच्या आणि उद्याच्या लेखकांनी माणसाचं हे अवमूल्यन, त्याचं कोसळणं, माणसातून निघून वस्तूत अडकणं हे समजून घेतलं पाहिजे. त्याला मानवी कळपात आणण्याचा प्रायत्न केला पाहिजे. एकीकडं हे शक्तीचे, समृद्धीचे अचाट प्रायोग, तर दुसरीकडं कालचा आणि आजचा पाऊस पडलाच नाही आणि उद्या तरी पडणार की नाही, अशी भ्रांत असणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पाण्यावरून जगभर नवे संघर्ष निर्माण झाले. आकाशातले ढग पळवण्याचे बेत आखले जाऊ लागले. पाण्यावरून नव्या जाती निर्माण झाल्या. बिसलरीवाली माणसं, पिल्टर केलेलं पाणी पिणारी माणसं, डबक्यातलं पाणी पिणारी माणसं आणि कसलंही पाणी न पिता शीतपेयं पिऊन जगणारी माणसं… पाणी मिळविण्यासाठी… रस्ता मिळविण्यासाठी… भाकरी मिळविण्यासाठी एक नवी लढाई सुरू झाली. गाव विरुद्ध शहर, शहर विरुद्ध महानगर, महानगर विरुद्ध ग्लोब, बिसलरीविरुद्ध डबकेवाले, भाकरीविरुद्ध बर्गर, ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन, रेंज मिळवणारे विरुद्ध रेंज गमावणारे अशा नाना प्राकारच्या लढाया सुरू झाल्या. आपलं साहित्य हे सारं पाहतं आहे का, आणि त्याचं चित्रण त्याच्या साहित्यात होत आहे का, हे पाहायला हवं. या नव्या लढाया, नवी मैदानं, नवे नियम आपल्या कवितेत येत आहेत का? वाघ आणि शेळीच्या लढाईत कोण हरेल, याचं उत्तर पूर्वी शेळी असं यायचं. आता ते ज्याला एसएमएस अधिक मिळतील तो जिंकेल असं येतं. आपण सारे लिहिणारे, हे नियम समजावून घेतो आहोत काय? त्याचे परिणाम पाहतो आहोत काय? मला वाटतं, आपलं दुर्लक्ष होत आहे. कोणत्या ना कोणत्या तरी लढाईत परिवर्तनाच्या प्रावाहात स्वत:ला गुंतवून ठेवणा-या साहित्यिकांची संख्या एकेकाळी आपल्याकडं प्रचंड होती. तो स्वत:ला बांधून घ्यायचा. कृतीला आणि विचारालाही बांधून घ्यायचा. त्याचा त्याला अभिमान वाटायचा. मी बांधीलकी मानणारा माणूस आहे, लेखक आहे हेही तो अभिमानानं सांगायचा. पण काळ बदलत गेला आणि लेखकाचं हे बांधून घेणं कमी होऊ लागलंय. सैल होऊ लागलंय. हे जे वर्तमान मी मांडतो आहे त्याला भिडण्याचं काम आपल्या साहित्यानं केलं पाहिजे. मी कुणाशीच बांधील नाही, माझा मी मुक्त, मी वर्तमानाला भिडणार नाही, मी भविष्याचा वेध घेणार नाही अशा प्राकारची मानसिकता वाढताना मला दिसत आहे. ती साहित्याचा प्राभाव कमी करणारी आहे आणि माणसाच्या लढायांपासून दूर जाणारीही आहे. आपली कविता, कथा, कादंबरी, नाटक जर वास्तवाचं प्रातिबिंब असेल तर ते ठिसूळ, अस्पष्ट, प्रभावहीन का होतं आहे? वर्तमान पकडण्यात जर आपण कमी पडलो, तो बदलण्याच्या प्रायत्नांपासून दूर झालो तर आपलं साहित्य कुपोषित होईल. मला आठवतं, केरळमध्ये काही मुलांनी एकत्र येऊन, एका मोठ्या कागदावर चित्रात जागतिकीकरण पकडण्याचा प्रायत्न केला होता. कागदावर डुकरांची भली-मोठी रांग होती. सर्व डुकरं सशक्त होती. सर्वांत शेवटच्या डुकरामागे बिथरलेल्या, हरलेल्या माणसाचे डोळे भास वाटावेत अशाप्रामाणे दाखवले होते. जागतिकीकरणात डुकरं मोठी होतात. माणूस छोटा आणि दुर्बल होतो हे त्या मुलांना सुचवायचं होतं. आपल्या मराठी साहित्यात माणसाच्या नव्या लढाया दिसायला हव्यात. नवी आयुधं दिसायला हवीत. शब्दांचा माणसाला आधार वाटायला हवा आणि त्यातील ऊर्जाही त्याला मिळायला हवी. आपण वर्तमान पाहण्यात, तो पचवण्यात, त्याला भिडण्यात लेखक म्हणून कमी पडतो आहोत का, असं मला वाटायला लागलं आहे. वर्तमान खरोखरच पेचप्रसंगांनी भरलेला आहे. त्याला सामोरा जाणारा आणि लढणारा नवा महानायक आपल्या साहित्यानं जन्मास घालायला हवा. असा महानायक जन्माला घालावा, की जो या पेचप्रसंगात डुकरापेक्षा माणूस मोठा आहे, वस्तूपेक्षा माणूस मोठा आहे असं बुलंद आवाजात सांगेल.
यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात एकतर माणसाच्या संवेदनाच बोथट होऊ लागल्या आहेत किंवा त्याचंही यांत्रिकीकरण होऊ लागलं आहे. आज अशी परिस्थिती आली आहे, की जेथे साहित्यानं जीवनवादी भूमिका अधिक व्यापक करायला हवी. जीवनवादी किंवा माणूसवादी याचा अर्थ प्रारंभी आणि शेवटी माणसांचाच विचार करणारं साहित्य. आपल्या लेखनात अनेक प्रश्न येतात. येत राहतील; पण त्याचं विश्लेषण करताना सारे जुनेच मार्ग आपण वापरतो. जागतिकीकरणात हे प्राश्न कसे गुंत्याचे झाले आहेत, हेही आपण लिहायला हवं. जुन्या गुलामीविरुद्ध तर लिहिलंच पाहिजे; पण नव्यानं आलेल्या गुलामीचा वेध आपण कसा घेणार? एक बँक हलायला लागली, की जगभरातल्या लाखो लोकांच्या नोक-या जातात. कंत्राटी संस्कृतीत नवे गुलाम जन्माला येतात. भूदास, श्रमदास आणि हा नवा ग्लोबलदास असा हा प्रवास चालू आहे. या विषयावरही अन्य भाषांमध्ये भरपूर लेखन येत आहे. माझ्या माय मराठीत ते का येत नाही? आपला लेखक-कवी हे नवं पर्यावरण भेदण्याचा प्रायत्न करतो आहे काय किंवा काठावर बसून पाहतो आहे हे सारं… पर्यावरणात नव्यानं तयार होणा-या लढायांतून तो स्वत:ला दूर ठेवू पाहतो आहे काय किंवा त्याची उपस्थिती कमी होते काय? एकीकडे प्रचंड स्वातंत्र्य आणि दुसरीकडे व्यक्त होण्याचाही संकोच, असं दुभंगलेलं चित्र जे निर्माण होतं आहे, त्याचा तो अर्थ शोधून घेतोय काय? नव्या काळातील या कथित उदंड स्वातंत्र्याचा अर्थ तरी समजून घेतोय का? मला वाटतं, तसा प्रयत्न करायला हवा.
गेल्या दशकात जागतिकीकरणाचे खरे-खोटे चेहरे उघड करणारं साहित्य मराठीबाहेर मोठ्या प्रामाणात लिहिलं-वाचलं जातं आहे. आपल्याला उशीर का लागतो? जीवनाला भिडताना आपण वेळ का गमावतो? या नव्या पर्यावरणाचा आणि त्यात घुसमटणा-या मानवी मूल्यांचा आणि ती जन्माला घालणा-या व्यवस्थेचा वेध आपण घेणार की नाही? किती वर्षं आपण व्याख्या आणि संज्ञातच अडकणार? या नव्या साहित्यासाठी नव्या फूटपट्ट्या आणणार की नाही? नाकावर लटकलेल्या चष्म्याची धूळ झटकणार की नाही? असे अनेक प्राश्न माझ्यासमोर आहेत. मूल्यऱ्हास होत असेल, तर आपण सरसावून लिहीत का नाही? आपण नव्या वातावरणात महाकादंबऱ्या, महानाट्ये, महाकाव्यं, महाचित्रं का जन्माला घालत नाही? आपण चटकन युगांतर का करत नाही? हे सारं घडलं, तर आपलं साहित्य समृद्ध होईल. आधुनिक होईल. भाषा समृद्ध होईल. जीवनमूल्यं समृद्ध होतील. आपण आता कशाची वाट पाहतोय? कुणाची वाट पाहतोय?
जागतिकीकरणात माणूस इतका धावतो आहे, इतका धावतो आहे, की कधी-कधी तो स्वत:ची सावली आणि स्वत:चा चेहराच हरवून बसतो. या धावण्यात त्याच्या संवेदनाही सांडून जातात आणि त्याच्या सावल्याही बेईमान होऊन, पितूर होऊन गळून पडतात कुठंतरी कोसावर… माणसाला नव्या युगानं नुसती गतीच दिली नाही, तर त्याचं विभाजन केलंय. पूर्वी तो जाती, धर्म, पंथ, प्रादेशात विभागला गेला होताच. आता त्याचं विभाजन अन्य असंख्य गोष्टींत झालं आहे. जुन्या जाती कायम असताना त्यांना नवी जातसुद्धा चिकटवली गेलीय. उदाहरणार्थ, पूर्वी सर्व कामगारांची विभागणी दोन घटकांत केली जायची. पांढ-या कॉलरचा आणि निळ्या कॉलरचा श्रमिक. आता कॉलरची संख्या मोजता येत नाही, ती एवढी वाढली आहे, की प्रात्येक जण हातात हात घालून चालण्याऐवजी हात सोडून स्वतंत्रपणे धावू लागला आहे. प्रत्येकाचं एक स्वतंत्र ठिकाण आहे. त्याला तिथंच पोचायचं आहे; पण हे ठिकाणही मृगजळासारखं आहे. माणूस जसा जवळ जाईल तसं हे ठिकाण दूर-दूर जातं. धावताना, पळताना, ठिकाण पकडताना त्याची दमछाक होते. हात सोडून पळण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा त्याच्या संवेदना चहूबाजूला सांडतात. पुढं धावणारा आणि मागून येणारा यांची टक्कर होते. सबल आणि दुर्बलांच्या टकरीत आणि गतिरोधकावरून उड्या मारतानाही माणसं रक्तबंबाळ होतात. काही वेळा त्यांच्यातील माणूसपणही सांडून जातं किंवा तेही जखमी होतं. विखुरलेल्या संवेदनांची माळ त्याच्या गळ्यात घालण्याचं, हरवत चाललेलं त्याचं माणूसपण त्याच्या ओंजळीत टाकण्याचं, त्याच्या जखमांवर मूल्यांची पुंकर घालण्याचं काम साहित्याला करावं लागणार आहे. वाङ्मय म्हणजे मनोरंजनाचंच साधन, वाङ्मय म्हणजे केवळ घडवून घडवून तयार केलेला एक दागिनाच, वाङ्मय म्हणजे कोणीतरी तयार केलेल्या सांगाड्यात गच्च बसवण्याचं साधन या संकुचित कल्पनेतून बाहेर पडायला हवं. जीवन अखंड धावत असतं… वेगवेगळं रूप धारण करून धावत असतं. हे नवं रूप काय आहे? त्याला अस्वस्थ करणारे कोणते नवे विषाणू तयार झाले आहेत, हे पाहण्याचं आणि त्याबाबत जागल्याची भूमिका करण्याचं कामही साहित्याचंच असतं.
वेगवेगळ्या प्राकारच्या विषमतेवर उभ्या असलेल्या समाजात अनेक वेळा माणूस जसा चेहरा हरवून बसतो, तसा व्यवस्था त्याचा चेहरा हिरावूनही घेते. वरची चामडी तर पाडून काढतेच; शिवाय तिच्या मागं लपलेल्या चामड्याचे सर्व पदरही पाडून, कुरतडून काढते. त्याचा इतिहास, भूगोल नाकारते. वर्तमान आणि भविष्य नाकारते. असे बिनचेहऱ्याचे किंवा व्यवस्थेच्या जबड्यात आपला चेहरा गमावून बसलेले कोट्यवधी लोक जगात आहेत. जागतिकीकरणात अशा लोकांची संख्या वाढते आहे. ती कोणी मोजत नाही. स्पधेर्ला मरणाच्या संख्येशी देणंघेणं नसतं; पण साहित्यिकाला मात्र ते असतंच असतं. असावंच लागतं. माणसाला, ‘ तू माणूस आहेस ‘ हे सांगण्याचं काम सर्वांत अधिक करतं ते साहित्यच! जर माणसाला चेहराच नसेल किंवा त्याची स्वत:च स्वत:ला ओळख नसेल तर काय होईल, याविषयी ओशोंनी एक मोठं मार्मिक उदाहरण सांगितलं आहे, ते आपल्यासमोर मांडणं मला उचित वाटतं… तर आरसा सर्वांपर्यंत पोहोचलाच नव्हता तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी एका शेतकऱ्याला घरी परतताना एका मळलेल्या वाटेवर एक काचेचा तुकडा सापडला. तो आरशाचाच एक तुकडा होता; पण शेतक-याला ते माहीत नव्हतं. त्यानं त्याच्या सात पिढ्यांत कधी आरसाच पाहिला नव्हता. त्यानं तो तुकडा उचलला. साप केला. आपल्या डोळ्यासमोर पकडला. क्षणभर त्यात पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला तो ओरडला, ‘ कितने दिनों के बाद मिल रहे हो दादाजान! ‘ त्याला दादाजान भेटल्याचा खूप आनंद झाला. तो रोज-रोज हा तुकडा बघू लागला. रोज-रोज ‘ सलाम अलेकूम दादाजान ‘ म्हणू लागला. आपला नवरा खूपच आनंदी दिसतोय म्हणून त्याच्या पत्नीनं एक दिवस त्याला या आनंदाचं रहस्य विचारलं; पण रहस्य वगैरे काही नाही, असं सांगत तो शेतावर निघून गेला. तो गेल्यानंतर तिनं पतीच्या खोलीची झाडाझडती घेतली. तिलाही हाच काचेचा तुकडा सापडला. तिनंही आपल्या डोळ्यांसमोर तो धरला आणि ती जोरात कडाडली, ‘ इस बजारबटू को देखकर वो रोज रोज हसता है क्या? खुश रहता है क्या? ‘ नवरा परतल्यावर तिनं तो काचेचा तुकडा त्याच्या डोळ्यांसमोर पकडला आणि विचारलं, ‘ या बजारबटूला बघून तुम्ही रोज रोज हसता काय? ‘ तो म्हणाला, ‘ भलतंच काय, यात तर माझे दादाजान आहेत. ‘ ती म्हणाली, ‘ खोटं आहे, बजारबटू आहे ‘ आणि तो म्हणाला, ‘ दादाजान! ‘ दोघांचं भांडण सुरू झालं. ते मिटवण्यासाठी ते काझीकडं गेले. त्यानंही तो तुकडा पाहिला. त्यालाही आरसाबिरसा काही माहिती नव्हता. तुकडा पाहून तोही गंभीरपणे म्हणाला, ‘ हे पहा मुलांनो, या काचेच्या तुकड्यात ना कोणी बजारबटू आहे, ना कुणाचा दादाजान. खरंच ऐकायचं असलं तर मी सांगतो, की यात माझे स्वत:चे नानाजान आहेत. ‘
ज्याला स्वत:चा चेहराच ओळखता येत नसेल, तर तो स्वत:ला काहीही समजतो. साहित्याचं हे काम आहे, की त्यानं माणसाला त्याचा चेहरा प्राप्त करून देणं. आरसा नीट राहावा म्हणून त्याच्यामागचा पाराही जपणं. महानगर, नगर, खेडी, झोपड्या या साऱ्याच ठिकाणी माणसाच्या चेहऱ्यावरचं वस्तूचं ओझं वाढतं आहे. चेहरा पराभूत होतो आहे आणि वस्तू जिंकते आहे. महानगरातला माणूस सर्वांत सुखी आहे आणि सगळा उजेड त्याच्याच चेह-यावर आहे, असंही समजण्याचं काही कारण नाही. तो पूवीर् आपल्या घराचा पत्ता सांगताना शाळेच्या मागं, बागेच्या पुढं, मंदिराजवळ असं काहीतरी बोलायचा. आता त्याची ही भाषा बदलली. तो आता दंगल झाली होती त्या ठिकाणाजवळ, विटंबना झालेल्या पुतळ्यामागं, बॉम्बस्पोट झाला त्याच्याच पुढं किंवा धर्माचं नाव घेत माणसं कापली गेली त्या ठिकाणी; असं काही तरी सांगतोय. स्वत:च्या घराचा बदललेला पत्ता सांगण्यासाठी अशी ठिकाणं वापरतोय… सशाचं काळीज घेऊन तो जगतोय. कधी नव्हं एवढी एक विलक्षण अस्वस्थता, विलक्षण असुरक्षितता त्याला घेरते आहे. मी माझ्याच एका कवितेत या अस्वस्थ माणसाचं वर्णन करताना म्हटलं आहे, की-
कॅरिबॅगमधून आता
प्रश्न वाहून नेताहेत
इथले सारे लोक
दुधाच्या पिशव्या
फ्रिजमध्ये ठेवाव्यात त्याप्रमाणे
आसवांच्या पिशव्या
फ्रिजमध्ये ठेवून
फिरताहेत इथले सारे लोक
फ्लॅटवर काळीज ठेवून
रस्त्यावर फिरताहेत इथले सारे लोक…
मला वाटतं, या सा-या असुरक्षित जिवांच्या काळजात डोकावणं आणि त्यांची जगण्याची उमेद वाढवणं हे साहित्याचं काम आहे. जेव्हा सारी व्यवस्था सडायला लागते, मूल्यं कुजायला लागतात, आपल्याच सावल्या आपल्याशी बेइमानी करायला लागतात आणि आपलीच आसवं आपल्या डोळ्यांत ठिणग्या बनून बंड करायला लागतात, तेव्हा साहित्यिकांनाच पुढं यावं लागतं. त्यांनी आलंच पाहिजे. त्यासाठी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. जुन्या परंपरा पाळत आपल्याला नवे प्रश्न कळणार नाहीत. मांजराची जुनी कथा सांगत स्क्रीनवरच्या उंदराचा खेळ कळणार नाही. एका क्षणात आपण ‘ डिलीट ‘ का होतोय हेही कळणार नाही. मला वाटतं, या सा – या विषयावर व्यापक चर्चा करण्यासाठी संमेलनासारखं दुसरं व्यापक ठिकाण नाही. आपल्याला धावायचं तर खूप आहे. चालायचं तर खूप आहे; पण हातातील मूल्यं घरंगळत आपल्याच पायांखाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी साहित्य कधी लाल, तर कधी हिरवा झेंडा घेऊन उभं राहतं. कधी जागल्याची भूमिका करतं. माणसाचा शेवट संगणकाच्या नव्हे, तर माणसाच्याच खांद्यावर होईल, याची काळजी घेतं.
जागतिकीकरणाच्या रेट्याचा सर्वात अधिक परिणाम ग्रामीण भागावर होतो आहे, हे मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. तेथील साधनसामग्रीवर कुणातरी कंपनीचा, कुणातरी धनदांडग्यांचा हक्क प्रास्थापित होतो आहे. वेगवेगळ्या नावांनी येणारे झोन ग्रामीण भागाला समृद्ध करण्याऐवजी त्यांचं शोषण करत आहेत. पाणी, जंगलं, नद्या, नाले, डोंगर आदी अनेक गोष्टींचं खासगीकरण होत आहे. हंडा, घागरीत भरलं जाणारं पाणी आता बाटल्यांत भरलं जातं आहे. जागतिकीकरणाला टक्कर देण्याची क्षमता गावांत राहिली नाही. गावंच्या गावं स्थलांतरित होत आहेत. शहरातील फूटपाथवर चुली मांडत आहेत. महानगरात भाकरीच्या तुकड्यासाठी बंबाळ होणारी, स्पीडब्रेकरला ठेच लागून पडणारी आणि स्थलांतरित; असा एक शिक्का कपाळावर घेऊन जगणारी माणसं वाढत आहेत. ग्रामीण भागावर आपल्याकडं खूप लिहून झालं आणि लिहिलं जातं आहे. आता ग्रामीण साहित्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ लिहून चालणार नाही, तर कशामुळे घडत आहेत या आत्महत्या आणि कोणता नवा खलनायक त्या घडवतो आहे, हे शोधायलाही म.फुल्यांनी साहित्य सभेला जसं पत्र दिलं होतं, तसं शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याविषयी इंग्रज मायबापालाही एक पत्र लिहिलं होतं. या देशात जेव्हा जेव्हा महामारी येते, जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो, महापूर येतो तेव्हा त्यात आपला बळीराजाच का मरतो, असा त्यांचा प्राश्न होता. दुर्दैवानं या प्राश्नाचं उत्तर आपण आतापर्यंत देऊ शकलो नाही. ना सरकारनं ना साहित्यानं दिलं. बळीराजा रोज मरत असल्याच्या काळातही आपण उत्तर देऊ शकलो नाही. पॅकेजचा पाऊस पाडूनही देऊ शकलो नाही. मरणाचे आकडे आपण अचूक मोजतो. मृतदेहाचं वर्णनही अतिशय संवेदनशील होऊन करतो. जागतिकीकरणामध्ये दिसत असलेल्या मरणाचं एक मोठं वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे येथे मृतदेह दिसतात, मरण दिसतं पण ते घडवून आणणारी व्यक्ती किंवा खलनायकी घटक मात्र दिसत नाहीत.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आतापर्यंत कोणत्या अर्थव्यवस्थेला, घटकाला शिक्षा झाल्याचं किंवा कुणाची खुचीर् गेल्याचंही मला माहीत नाही. ही मरणं अशीच सुरू राहणार आणि मारेकरी नेहमीच अदृश्य राहणार का; हा माझा प्राश्न आहे. याचं उत्तर देण्यासाठी फुल्यांचा आसूड लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिकीकरण ओळखेल आणि अदृश्य खलनायक शोधून काढेल अशा आसूडाची गरज आहे. हे सांगताना मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट नमूद करू इच्छितो आणि ती म्हणजे, आपला विरोध जागतिकीकरणाला नाही, तर त्यानं आणलेल्या नव्या शोषणव्यवस्थेला आणि अदृश्य खलनायकांना आहे. म.फुल्यांनी आपलं एक पुस्तक अमेरिकेतील निग्रो बांधवांना अर्पण करून एका अर्थानं जागतिक पातळीवरील दु:खाशी नातं जोडलं होतं. इथंही मानवमुक्तीची लढाई सुरू होती आणि तिकडं अमेरिकेतही सुरू होती. या दोन महालढायांचं नातं त्यांनी जोडलं होतं. या नात्यांचंच जागतिकीकरण केलं होतं आणि शोषणाला करावयाच्या विरोधाचंही जागतिकीकरण केलं होतं. आपण आपलं कोणतं साहित्य कोणत्या महालढायांना अर्पण करत आहोत? कोणत्या लढायांचं जागतिकीकरण आपल्या साहित्यातून होतं आहे, याचा थोडा तरी विचार करू या. मी जीवनवादी होऊन कलेकडं दुर्लक्ष करतोय, असा त्याचा अर्थ नव्हे. कला जीवनातच निर्माण होत असते आणि जीवनही तितकंच वाहक असतं, असंही मला वाटतंय. याच ठाण्याला पहिले कामगार पुढारी मेघाजी लोखंडे यांची कामगार, श्रमिक चळवळींची परंपरा आहे. सत्यशोधकी विचारांची परंपरा आहे. बंडखोर भागवत शास्त्रींची परंपरा आहे. विशेष म्हणजे म.फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसुडाचं लेखन याच ठाणे जिल्ह्यातील वांगणी या गावी केलं होतं. ही परंपरा ऐकून माझी अपेक्षा बळावलीय.याच परंपरेत होत असलेल्या संमेलनात कोणीतरी माझा भाऊ, बहीण पुढे येईल आणि नवा आसूड तयार करील, असा मला विश्वास आहे. नव्या आसुडाची निर्मिती हेच या संमेलनाचं पलित असेल. चला, नव्या आसुडाच्या निमिर्तीला लागू या. ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारं आपण भरपूर लिहिलं. ते लोकमान्यही झालं.राजमान्यही झालं. विद्यापीठाच्या बुकातही गेलं. पण, आजचं ग्रामीण वास्तवही मी मांडायचा प्रायत्न करतोय. हे वास्तव खूप वेगळं आहे. पिकं अंगावर घेणा-या जमिनीवरही तर लिहावंच लागेल आणि ती तरारून यावीत म्हणून मातीच्या गर्भाशयात जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्यावरही लिहावं लागेल. शेतात राबणाऱ्या एका कवयित्रीनं अशी कविता लिहिलीय. पूर्ण पिकण्याआधीच कापली जाणारी कणसं तिला हुंडाबळीसाठी मारल्या जाणाऱ्या बायाबापड्यांसारखी वाटतात. कणसांचा मरणोत्सव वाटतो तिला. इव्हेन्ट साजरा करणाऱ्यांनी हे नवं तंत्र आणलंय. जमीन लवकर निर्मितीक्षम व्हावी, ती लवकर वयात यावी, लवकर बाळंत व्हावी यासाठी जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्याचंही वर्णन तिनं केलंय. जमिनीचं बाळंतपण झटपट व्हावं, खूप लवकर पिकं यावीत, असं व्यवस्थेला वाटतंय. अकाली बाळंतपण या जमिनीच्या वाट्याला आलंय. ते नको म्हणून आता माझं सीझर कर, अशी विनंती जमीनच करू लागलीय. एक छान पण काळीज हादरून टाकणारी कविता वाचायला मिळाली, याचा आनंद मला वाटतोय. कल्पना दुधाळनं ती लिहिलीय. तिला जागतिकीकरणही कळलं, असं मला वाटतंय. साऱ्यांनीच ते समजून घ्यायला हवं.नुसतं वर्णनात्मक नव्हे, तर संघर्षात्मकही लिहायला हवं. जमिनीचा गर्भ कोणी भ्रष्ट करू नये, यासाठी विषाणू मारणारंही लिहायला हवं.
मी हे जसं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं सांगतो आहे, तसं शहरात राबणाऱ्या माणसांचं आहे. तेही लढून लढून रक्तबंबाळ होत आहेत. त्यांचीही दिशाभूल होत आहे. बर्गरवाले आणि भाकरीच्या शिकारीतच खलास होणारे चेहराहीन, यांच्यातील दरी वाढते आहे. बर्गर आणि भाकरी यांच्यातील लढाईतून हरणारे जसे तयार होतील, तसेच भाकरीसाठी गुन्हा करणारेही तयार होतील. विषमतेवर प्राहार करीत आणि समताधिष्ठित जगाचं एक सुंदर स्वप्न साहित्य तयार करतं. काव्यात्म न्यायाची भाषा करतं. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढायांमध्येही भाग घेतं. लढाया पेटवत माणसाला जागं करतं. लढणारं साहित्य आजही जगाच्या पाठीवर आहे. जागतिकीकरण समूहाचे तुकडे तुकडे करतं आणि प्रात्येकाच्या चेहऱ्यावर एका खोट्या प्रातिष्ठेची, खोट्या स्वातंत्र्याची, भ्रामक विकासाची चिकटपट्टी चिकटवतं.साहित्यिकांनी ह्या सर्व चिकटपट्ट्या ओरबाडून काढायला हव्यात. माझा मी बरा आहे, अशा भ्रमात त्यानं राहू नये.कारण हे कथित बरेपण अल्पजीवी आहे. आताच त्याचा वेध आपल्या साहित्यिकांनी घ्यावा. आपला समाज आणि आपला लेखक यांच्यात जे तुटलेपण आलंय, त्याची कारणंही शोधायला पाहिजेत. जागतिकीकरणामध्ये माणसाला समूहातून बाहेर काढण्याचा जो एक प्रायत्न असतो, त्याचाही हा एक भाग असू शकतो.क्षीण होत चाललेल्या चळवळी, क्षीण होत चाललेलं शासन, कल्याणकारी योजनांचा बट्ट्याबोळ या सर्वांचाही परिणाम असू शकतो. पण हेही खरं आहे, की या साऱ्या शक्ती क्षीण होतात तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी पुन:पुन्हा वाढत असते. जागतिकीकरणात जन्माला आलेले, दोन शतकांची घासाघीस होताना जन्माला आलेले आणि नव्या शतकाच्या प्रासववेदनांचे साक्षीदार असलेले; अशा सर्वांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी जीवनवादी साहित्याच्या पालखीला आपला खांदा द्यावा. नव्या प्रावाहात वाहून जाणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्या माणसाच्या बाजूनं लिहावं.
साहित्याला विचारांची, तत्त्वज्ञानाची मुळं असावी लागतात. वैचारिक साहित्य हे काम वर्षानुवर्षं करत आलं आहे. पायाभूत वाटावं असं हे काम आहे. त्रिकोणातील पाया म्हणजे वैचारिक साहित्य असतं. उरलेल्या कोनाला ते ऊर्जा पुरवत असतं. गेल्या दशकापासून वैचारिक साहित्याचा दुष्काळ आपल्याकडं नजरेत भरावा इतपत जाणवत आहे. गावोगाव विचार करणारी मंडळं असायची. कोल्हापुरात तर अनेक महाविद्यालयांमध्ये प्लेटो क्लब, अॅरिस्टॉटल क्लब, सॉक्रेटिस क्लब मी पाहिले आहेत. भोवतालच्या गंभीर प्राश्नावर चर्चा त्यात होत असे. विद्यार्थ्यांना विचारांकडं झुकवलं जात असे. आता यापैकी काही, महाविद्यालयांत आणि महाविद्यालयांबाहेरही राहिलं नाही. विचार वाहून नेणारी नियतकालिकं आणि अनियतकालिकंही कमी होत आहेत. त्यातून आणि त्याबाहेर झडणा-या चर्चाही कमी होत आहेत. मला वाटतं, विचारांचा आटणारा प्रावाह काही चांगल्या समाजाचं लक्षण म्हणता येत नाही. हे जे मांडलं, ते दृश्य आहे आणि ते का जन्माला आलं, याची कारणंही शोधलीच पाहिजेत. समाजाची वैचारिक भूक का कमी होते आहे आणि कोण ती कमी करतं आहे; हेही अशा संमेलनाच्या निमित्तानं शोधलं पाहिजे. सार्वजनिक व्याख्यानमालांमधूनही वैचारिक, गंभीर विषय हद्दपार होऊ लागले आहेत. गंभीर विषयावर बोलू नका. श्रोते येत नाहीत किंवा एखादा गंभीर बोलतो म्हणून त्याला बोलावलंही जात नाही. लोकांना हे असं गंभीर का नको आहे आणि त्याला हास्य क्लब का जवळचे वाटू लागले आहेत? मी कोणी हास्य क्लबचा विरोधक नाहीय. हसण्याचं महत्त्व मान्य करूनही हा प्राश्न मी उपस्थित करतो आहे. लोकांना खरंच मनापासून हसायचं, की स्वत:ला पसवण्यासाठीही हसायचं हेही तपासायला हवं. तर, मी वैचारिक साहित्यावर बोलत होतो. जागतिकीकरण, नवभांडवलशाही, नव्या स्पर्धा, लोकशाहीचा आणि सरकारचा संकोच, जगण्याचा संकोच आदी अनेक विषयांवर अपवाद वगळता आपल्याकडं अलीकडं पारसं लिहिलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. वैचारिक साहित्य मागं पडणार असेल, तर मूळ साहित्याचं कुपोषण होईल. राजकारण, शिक्षण, अर्थकारण, पर्यावरण आदी नाना विषयांतून वैचारिक साहित्य फुलत राहिलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आता मात्र त्याची न परवडणारी अशी पानगळ चालू आहे. ती थांबवायला हवी. वैचारिक साहित्याची घसरण कुणालाच परवडणारी नसते. त्यामुळे समाज मागंमागं जायला लागतो. साहित्यातही मागंमागं जायला लागतं. वैचारिक साहित्य पुढं जाण्यासाठी ऊर्जा देतं आणि डोळेही देतं.
समाजातील अनेक घटक अजून आपल्या साहित्यात अवतरायचे आहेत. काही प्रातिनिधिक स्वरूपात अवतरत आहेत, तर काही अजून सीमांवर आहेत. अनेक जातींमध्ये शिक्षण पोहोचलेलं नाही. शिक्षणाचा हक्क मिळूनही ते पोहोचलेलं नाही. ज्यांना शिक्षणाची परंपराच नाही असा समूह अजूनही शिक्षणाकडं येत नाही. शिक्षण नाही म्हणून लेखन नाही, असंही घडतं आहे. या सर्वांना शिक्षित करून त्यांच्यात लिहिण्याच्या प्रोरणा निर्माण करायला हव्यात. अंध, अपंग, निराधार, अनाथ, मतिमंद यांच्यापैकी अनेक जण आता लिहिते होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अनाथही लिहीत आहेत. आपले अनुभव मांडत आहेत. अनाथपण जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेची चिरपाडही करत आहेत. ऊसतोडणी कामगारावर पुस्तकं येत आहेत. या सर्व अनुभवांचं स्वत:ला मुख्य समजणाऱ्या साहित्यानं स्वागत तर केलंच पाहिजे; शिवाय त्यांना अधिकाधिक प्रोरणा देऊन स्वत:लाच समृद्धही करून घेतलं पाहिजे. विज्ञानकथांकडं आपण अजून निकोप भावनेनं पाहत नाही. विज्ञानकथा म्हणजे कलाहीन, प्रातिभाहीन केवळ तंत्राची जंत्री सांगणाऱ्या असे काहीतरी गैरसमज आपण करून घेतले आहेत. तेही तातडीनं दूर करण्याची आवश्यकता आहे. विज्ञानकथा जशा आवश्यक आहेत, तशा विज्ञानकादंबऱ्या आणि विज्ञानकविताही आवश्यक आहेत. या सर्वांना साहित्य म्हणताना खळखळ करता कामा नये.
राजकारणावरील साहित्याचाही वानवा निर्माण झाला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय विषयावर साहित्यनिर्मिती झालेली नाही. आपण राजकारणाला आणि राजकारण्यांना तुच्छ समजायला लागलो. समाज नासवणारे, कोणीतरी परग्रहावरील ते जीव आहेत, या भावनेनं त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागला आहे. आम्हाला त्यांचा शेजार नको, अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मला वाटतं, त्याविषयी मतभेद असू शकतात, होऊ शकतात. आपल्या जीवनाचा एक मोठा भाग राजकारणानं व्यापला आहे. अशा परिस्थितीत हा मोठा भाग आपण पाहणारच नाही. त्यावर लिहिणारच नाही, असं म्हणणं टोकाचं ठरावं. चांगली लोकशाही पाहिजे असेल, तर चांगल्या लोकांबरोबर चांगल्या राजकारण्यांचीही गरज भासते. ते तयार करण्याचं काम, त्याला गती देण्याचं काम समाज आणि साहित्यिक या दोघांचंही आहे. एक प्रचंड मोठं विश्व साहित्यबाह्य करण्यानं साहित्याचीच हानी होईल. राजकारणावरील लेखनाचंही स्वागत केलं पाहिजे आणि साहित्यानंही राजकारणालाही जागा दिली पाहिजे. आपल्याला लाभलेली लोकशाही तपासत राहिलं पाहिजे. ती धनदांडग्यांच्या हातात का जाते आहे? ती विशिष्ट घराण्यांच्याच हातात का जाते आहे? ती मनगटशाहीच्या प्राभावाखाली का जात आहे? खरंच आज जिला आपण लोकशाही म्हणतो, ती लोकशाहीच आहे, की तिची भ्रष्ट प्रातिमा आहे, हे तपासण्यामध्ये साहित्यिकही आघाडीवर असावा लागतो. नव्या समाजाचं, नव्या माणसाचं स्वप्न तोच पेरत असतो. साहित्यिक आणि राजकारणी यांच्या नातेसंबंधावर आतापर्यंत खूप चर्चा झाली आहे. राजकारण्यांच्या प्राभावाखाली राहून लेखन करा असं कोणी म्हणत नाही आणि ते कोणी ऐकणारही नाही आणि ऐकण्याचं काही कारणही नाही. आपापल्या बिंदूवर राहून या दोन्ही घटकांनी परस्परांकडं जरूर पाहायला हवं. एकानं दुस-याला बहिष्कृत करण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रामाणं राजकारणाविषयी सकस आणि मुबलक लेखन साहित्यात येत नाही. कविता होतात अधूनमधून; पण कथा-कादंबऱ्यांमध्ये त्याला नावालाच जागा मिळत असते. तसं प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात राजकारण असतंच असतं. लोकशाहीत प्रत्येकाला मत असतंच असतं. ते मत म्हणजे एखादी गोष्ट ठरवण्याचा अधिकार आहे, तसं आपापल्या ठायी असणाऱ्या राजकारणाचं ते प्रतिनिधित्वही आहे. साहित्यात हा विषय नको, अमकाच पाहिजे, अमक्यामुळं अमुक घडतं असा वाद बरोबर नाही, असं माझं मत आहे. निरर्थक वाद किती ताणवायचा आणि तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे. तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे.
समाजात सुरू असलेल्या आर्थिक बदलामुळे नवे वर्ग किंवा समाजघटक तयार होत आहेत. विस्थापित, धरणग्रस्त, स्थलांतरित, प्रकल्पग्रस्त, सेझग्रस्त वगैरे वगैरे; अशी अनेक नावं सांगता येतील. विस्थापित झाल्यानंतर सामाजिक दर्जांपासून त्याचे अनेक प्राश्न निर्माण होत आहेत. गावात जगता येत नाही म्हणून कायमचं स्थलांतर करणारे, अर्धस्थलांतर करणारे, वेगवेगळ्या कामांसाठी हंगामी स्थलांतर करणारे असे अनेकजण यांच्यात आहेत. सेझविरुद्ध लढणारे आहेत, प्रकल्पानं आपलं गाव गिळू नये म्हणून लढणारे आहेत. स्थलांतर करणा-याचा प्रश्न जगभरातील साहित्यात दिसू लागला आहे. तो आपल्याही साहित्यात दिसायला हवा. हा जो नवा उपेक्षित वर्ग आहे, त्याच्या वेदनांना आपण शब्द द्यायला हवेत. गर्भातच मुलींची होत असलेली कत्तल, नव्या व्यवस्थेनं महिलांचं वस्तूत केलेलं रूपांतर, मोठ्या प्रामाणात जन्मास येत असलेल्या परित्यक्ता असे कितीतरी विषय साहित्यिकांना खुणावत आहेत. भांडवलशाही व्यक्तीला प्रचंड स्वातंत्र्य देत असतं; पण त्याचं प्रायोजन व्यक्तीपासून व्यक्तीला अलग करण्यासाठी, माणसाचीच वस्तू करण्यासाठी असतं. महिला आज नेमकं कोणतं स्वातंत्र्य मिळवत आहेत आणि ती काय गमावते आहे, तिच्या आत्मसन्मानाचं काय होतं आहे, हाही आजच्या आणि उद्याच्या कवितेचा विषय आहे.
केवळ आपल्यालाच नव्हे, तर जगाला भेडसावणारा दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद हे विषय तर अतिशय गंभीर बनत आहेत. आपल्या साहित्यात मोठ्या प्रामाणात ते प्रातिबिंबित होताना दिसत नाहीत. गुजरातमधील हत्याकांड असो, मुंबईवरील हल्ला असो, मालेगावमधील स्पोट असोत, पुण्यावरील हल्ला असो; आपल्या साहित्यिकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आणि किती भूमिका घेतली हे आपणच आपल्याला विचारायला हवं. या सर्व परिस्थितीत आपला लेखक भूमिका घेणारच नाही का? मला वाटतं, भूमिका घ्यायला हवी. मूलतत्त्ववादाला विरोध करण्यासाठी आपली लेखणी सरसावून पुढं आली पाहिजे.
आता थोडं मराठीविषयीही बोलू या. मराठी भाषेचं काय होणार? जागतिकीकरणाचा परिणाम तिच्या अस्तित्वावर कसा होणार असे प्राश्न आहेत. संमेलनात आणि संमेलनाबाहेरही आपण त्याचा विचार करतो. शासनालाही साकडं घालतो. मुळात भाषा समाजच जन्माला घालतो. समाजच ती जगवतो आणि समाजच ती विकसित किंवा अविकसित बनवतो. भाषेच्या संवर्धनात शासनाची भूमिका तर असतेच; पण त्याहून समाजाची भूमिका खूप मोठी असते.सरकार या भूमिकेला तांत्रिक मदत करत असतं. समाज म्हणून आज आपण मराठीकडं कसं पाहतो, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी भाषा, व्यवहाराची, ज्ञानाची झाली, परिवर्तनाची झाली, की ती सर्व प्रकारचे धोके पचवू लागते. काळाबरोबर ती चालू लागते.व्यवहारात ती मराठी भाषेचा परीघ कसा वाढवता येईल, ज्ञानाचा कोष म्हणून तिच्याकडं कसं पाहता येईल हा विषय सर्वात अधिक महत्त्वाचा आहे. रस्त्यावर चालणारा व्यवहार, रस्त्यावर होत असलेले ज्ञान-विज्ञानाचे स्फोट यांच्याशी आपण आपल्या भाषेचं नातं जोडायला हवं. आपल्या हातात येणाऱ्या मोबाइलचा एक हँडसेट दीडदोन हजार इंग्रजी शब्द आपल्याकडून पाठ करून घेतो. या नव्या शब्दांच्या संस्कृतीत आपल्याला घेऊनही जातो. स्वाभाविकच मातृभाषेचा संकोच व्हायला लागला, असं आपल्याला वाटायला लागतं. खरं तर, लोकजीवनात आणि व्यवहारात रूढ होणारे सारे इंग्रजी शब्दही मराठीनं आत्मसात करायला हवेत. अन्य भाषा तसा प्रायत्न करत आहेत. इंग्रजीनं तर तो कधीच सुरू केला आहे. लोकजीवनात मराठीचा जो वापर होतो आहे, त्याकडं आपण सोवळं नेसून न पाहता तेथील शब्दही मराठीनं आत्मसात करून स्वत:ला समृद्ध केलं पाहिजे. तसं घडायचं असलं, तर प्रामाण-अप्रामाणच्या चौकटी सैल केल्या पाहिजेत. आदिवासी भागातील काही मुली एकत्रित करून आम्ही त्यांना नाशिकमध्ये आणलं होतं. या मुलींनी कधीच आधुनिक उपकरणं पाहिली नव्हती. पंखा सुरू असलेल्या एका हॉलमध्ये त्यांना आणलं. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा त्या पाहू लागल्या; पण या उपकरणाला काय म्हणावं, त्यांना कळत नव्हतं. पंखा हा शब्द त्यांना माहीत नव्हता. शेवटी एका मुलीनं लागलीच एक शब्द जन्माला घातला. ‘ वर काय आहे? ‘ असं विचारता ती म्हणाली, ‘ भिरभिऱ्या! ‘ जो भिरभिर करतो, तो भिरभिऱ्या. एक नवा शब्द जन्माला आला होता. आता प्रश्न निर्माण होईल, की तो प्रामाण मानायचा, की अप्रमाण? माझ्या गावात माझ्याच गल्लीतल्या एका पोराचं नाव ‘ दुष्काळ्या ‘ असं ठेवण्यात आलं होतं. तीव्र दुष्काळात तो जन्माला आला होता. प्रमाणवाल्यांनी नाम म्हणून स्वीकारायला अमान्य केलं. पोराची टिंगलटवाळी होऊ लागली. असंच एका पोराचं नाव अतिसुंदर होतं. त्याचीही टिंगल झाली. पुढं त्यानंही आपलं नाव बदलून घेतलं; प्रमाण नाव ठेवलं. गुन्हेगारी जगामध्ये तर अनेक पोरांची नावं बंदुक्या, पोलिस्या, रिमांड वगैरे आहेत. आपापल्या पर्यावरणातून ही माणसं नवे शब्द जन्माला घालत असतात. भाषासमृद्धीसाठी अशा सर्व शब्दांचं स्वागत करायला हवं. लोकजीवनातील, बोलीभाषेतील अनेक शब्द आपण प्रामाणभाषेच्या वेशीवरच ताटकळत ठेवले आहेत. त्यांना आत घ्यायला हवं. इंग्रजी शब्द स्वीकारताना ते व्याकरणासह घेतो आहे का, हा विचारही महत्त्वाचा आहे. बस, टेबल, डॉक्टर, कलेक्टर, फॅन, पोन आदी अनेक शब्दांची अनेकवचनं इंग्रजी पद्धतीनं मराठीत करू लागलो, तर मात्र अडचण होईल. तात्पर्य, मराठी समृद्ध करण्यासाठी लोकजीवनाची, बोलीभाषेची, ग्रामी.ण भागाची दारं उघडायला हवीत. ‘ उपाशीपोटी पाणी प्यायल्यावर ते आतड्याला चावतं ‘ असं कुष्ठरोग झालेली एक बाई, मला तिच्या घरात पाणी देताना म्हणाली होती. पाणी आतड्याला चावणं हे मोठं विलक्षण वर्णन आहे. दारिद्र्याला कंटाळून शेतीच करणारी एक बाई शेतीची आणि त्यात रुतलेल्या माणसाची दुर्दशा सांगताना म्हणाली, की ‘ मडं पेरलं की पीक उगवतं! ‘ खूप काबाडकष्ट करायला लागतं, अक्षरश: मरायला लागतं, तेव्हा कुठंतरी पीक उगवतं, हेच तिला सांगायचं होतं. त्यासाठी काळीज पिळवटून टाकणारं विशेषण तिनं वापरलं आहे. आता हे सारे शब्द माझ्या मराठीत उगवतील का, हे मी पाहतो आहे. साहित्यात येऊ घातलेले जे विविध समूह आहेत, तेही आपली भाषा घेऊन येतील. मराठी समृद्ध करतील. म्हणून त्यांना लवकर बोलवा; त्यांचं स्वागतही लवकर करा.
मराठी भाषा संवर्धनात शासनाचीही जबाबदारी आहे. त्यानं त्याचा सारा कारभार मराठीतूनच केला पाहिजे, याविषयी आता कुणाला शंका राहिलेली नाही. सरकारनं जाणीवपूर्वक मराठी शाळा वाढवल्या पाहिजेत. शिक्षणाच्या हक्काची कशीतरी अंमलबजावणी केली एवढाच हेतू त्यामागं असता कामा नये. मुळात सरकारी मराठी शाळा बंद का पडताहेत, त्यामागची सारी कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. दुसरं म्हणजे स्वत:च्या खर्चातून नव्या शाळा उघडल्या पाहिजेत. शिक्षणातील आनंद वाढवणा-या आणि नव्या ज्ञानाला भिडणा-या त्या असल्या पाहिजेत. विनाअनुदान तत्त्वावर चालणारी शाळारूपी जी अनेक दुकानं आहेत, त्यांची अवस्था कधीतरी गांभीर्यानं पाहिली पाहिजे. मुलं सरकारी शाळेत अन्न, वस्त्र मिळूनही जायला का कुरकुरतात, याचीही कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. मातृभाषेविषयी प्रोम निर्माण होईल, अशा प्राकारचं अध्ययन करणाऱ्या शाळा असायला हव्यात. त्याविषयीचं नवं धोरणही ठरवायला हवं. इंग्रजीचा किंवा अन्य कोणत्याही भाषेचा द्वेष करून हे सारं करता येणार नाही. इंग्रजीचं अस्तित्व आणि विस्तार समजून घ्यायलाच हवा. उपयुक्तता समजून घ्यायला हवी. आपली मातृभाषा केवळ घरात न अडकता रस्त्यावरूनही डौलात प्रावास कसा करेल, याचा विचार करायला हवा. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत पुस्तकांच्या नेमणुकीपासून फेरविचार करायला हवा. मराठी माध्यमातील मुलांसाठी आणि इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी कोणती मराठी द्यायला हवी, याचाही विचार करायला हवा. सहज, सुलभ आणि भाषाप्रोम वाढवणारी अशी मराठी त्यांच्यासाठी असायला हवी. सध्या आपण कोणती मराठी देतो, याचा ज्यानं त्यानं विचार करायला हवा. मराठीचा विषय म्हणजे शाळा-महाविद्यालयांत अध्ययन करणाऱ्यांचा विषय होऊ नये, तर तो आपल्या सर्वांचा विषय बनायला पाहिजे.
आपल्या दैनंदिन जीवनात मराठी वाढवण्याच्या आणि ती टिकवून ठेवण्याच्या अनेक जागा आहेत. यापूर्वी अनेक अध्यक्षांनी त्यांचा उच्चारही केलेला आहे. दोन मराठी माणसांनी परस्परांत मराठीच बोलायला हवं. आपली सही मराठीत का करू नये? आपल्या सभा-समारंभाच्या निमंत्रणपत्रिका मराठीत का काढू नयेत? ग्रंथखरेदीवरचा खर्च का वाढवू नये? मराठी चित्रपट का पाहू नये? जागतिकीकरणात मातृभाषेकडे गेलो, की अप्रातिष्ठा होते अशा पालतू मानसिकतेतून बाहेर पडायला हवं.
मराठी वाचणारा वर्ग कमी होतो आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. अजूनही महाराष्ट्रात दरवर्षी दरडोई पक्त आठ-बारा रुपयांचीच ग्रंथखरेदी होते. विशेष म्हणजे एकीकडे लिहिणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असताना, वाचणारा वर्ग मात्र कमी होत आहे. शहरातलं हे चित्रच अधिक चिंताजनक आहे. अनुवादित पुस्तकं जास्त खपताहेत. हजारो पुस्तकं बाळगणा-या शेकडो ग्रंथालयांचा सदस्यवर्ग कमी होतो आहे. या ग्रंथालयांना नवे सदस्य मिळत नाहीत आणि दुसरीकडे आहे ते सदस्य टिकवून ठेवणं अवघड होतं आहे. ग्रंथालयसेवकांचे प्रश्नही गंभीर होत आहेत. महाविद्यालयातील बहुतेक वाङ्मय मंडळं मोडकळीस आलेली आहेत. उद्याचा साहित्यिक, उद्याचा वाचक घडवण्यासाठी प्रायत्न होत नाहीत. जे होतात, ते पुरेसे नाहीत. मराठीतून होणाऱ्या वादविवाद किंवा वक्तृत्व स्पर्धांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. वार्षिकात लिहिण्यासाठी नवे विद्यार्थीलेखक मिळेनासे झाले आहेत. मराठी विभागाच्या कार्यक्रमाला अन्य विभागांतील मराठी विद्यार्थी येत नाहीत. आणखी किती कहाण्या सांगाव्यात? मराठी विषयात पदवी घेतली, की आयुष्य वाया गेलं असं का वाटतं आहे, याचा विचार व्यवस्थेनं करायला हवा. विचार करत करत मुळाशी जायला हवं. तेथे तयार होणारी कारणं शोधायला हवीत. नुसतेच छाती बडवून, आक्रोश करून सुटण्यासारखा हा सोपा प्राश्न नाही.
भाषा संकटात आहे, याविषयी कुणाचंही दुमत नाही. प्रश्न आहे तो, ती संकटमुक्त कशी करण्याचा आणि भाषेला जीवनधारेप्रामाणं स्थान देण्याचा. केवळ बौद्धिक चर्चा करून हा प्राश्न सुटणार नाही. सारा समाज आपल्या भाषेबाबत जागृत झाला पाहिजे. त्यासाठीचे कार्यक्रम आपल्याकडे असायला हवेत. जे प्रायत्न सुरू आहेत, त्याला समाज म्हणून पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. आपली मराठी भाषा संचारासाठी नवं तंत्रज्ञान वापरते आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आपल्या कविता, आपल्या कथा कागदाबरोबरच संगणकाच्या पडद्यावर दिसत आहेत. आपले कवीही अशा पडद्यावर परस्परांना भेटत आहेत, गतीनं भेटत आहेत, ही चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.
आता थोडं आणि गांभीर्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्राश्नाविषयी. हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि लाखो मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे. गेली साठ वर्षं अशी मागणी या संमेलनाच्या व्यासपीठावरून होते आहे. बुलंद आवाजात ठरावही होत आहेत. प्रात्यक्षात हा प्राश्न सुटलेला नाही. या प्राश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील एकेकाळची बलदंड लोकेच्छा आणि राजकीय इच्छा आज कमी होताना आपण सर्वच जण पाहत आहोत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. एखादा प्राश्न दीर्घकाळ भिजत पडला, की उदासीनता यायला लागते, तसं होऊ नये म्हणून लोकमताचा आणि लोकरेट्याचा जागर सातत्यानं सुरू ठेवला पाहिजे. राजकीय शक्तींवर आणि शासनव्यवस्थेवर लोकमताचा दबाव आणला पाहिजे. मला वाटतं, की या प्राश्नावर महाकादंबऱ्या, महानाट्यं आणि सिनेमे जन्माला यायला पाहिजेत. मराठी बांधवांच्या संघर्षाचे पोवाडेही व्हायला पाहिजेत.मी स्वत: ह्या प्राश्नाची होरपळ सहन केलेली आणि पाहिलेलीहीह्म आहे. हा प्राश्न न्यायालयात आहे, हे उत्तर आपण किती काळ देणार आहोत? न्यायालय म्हणजे प्राश्न लोंबकळत ठेवणारी खुंटी होऊ नये यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे. न्यायालयाबाहेरच्या प्रायत्नांना चालना दिली पाहिजे. भाषकसंवेदना जागी ठेवली पाहिजे. एकीकडे प्राश्न लोंबकळत पडतो आहे आणि दुसरीकडे सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा संकोच होतो आहे. तेथील मराठी शाळा बंद पडत आहेत. कशातरी तग धरून राहिलेल्या शाळांची अवस्था वाईट होत आहे. मराठी शिकणारे विद्यार्थी कमी होत आहेत आणि जे मराठीला चिकटून आहेत, त्यांना आपलं भवितव्य काय, असा प्रश्न पडला आहे. संस्कृतीच्या अंगानंही असंच घडतं आहे. मराठी चित्रपट, नाट्य-कला या साऱ्यांची तेथे घुसमट होत आहे. ती थांबवण्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. समाज आणि शासन दोहोंनी करण्यासारखं आहे. एक म्हणजे, सीमाभागातील मराठी संस्कृतीला चालना देण्यासाठी तेथे चित्रपट, नाटक सातत्यानं होईल, याची काळजी घेतली पाहिजे. मराठी शाळांची दुरवस्था होणार नाही, त्या बंद पडणार नाहीत याची काळजी घेण्याचं महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारला वारंवार सांगायला हवं. मराठी ग्रंथ तातडीनं सीमाभागात उपलब्ध होतील, प्रासंगी सवलतीत उपलब्ध होतील, यासाठी प्रायत्न करायला हवेत. अशीच काळजी एकूण बृहन्महाराष्ट्रात घ्यायला हवी. एक तर, तेथील मराठी बांधवांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेचं, संस्कृतीचं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जतन आणि संवर्धन केलं आहे. पुढंही त्यांचे प्रायत्न चालूच राहणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासन आणि मराठी समाजानं प्रतिसाद द्यायला हवा. हा प्रातिसाद आथिर्क स्वरूपात आणि अन्य स्वरूपातही असू शकतो. पुढं मागं आपल्या मंत्रालयात भाषासंवर्धन आणि प्रासाराचंच पूर्णवेळ काम करणारं स्वतंत्र खातंही सुरू करायला हवं. अन्य अनेक राज्यांनी या गोष्टीस खूप प्राधान्य दिलं आहे. मला वाटतं, आपण याबाबतीतही थोडं मागंच आहोत. मराठी माणसांनी सांस्कृतिक कार्यक्रम तयार करून बृहन्महाराष्ट्रात सातत्यानं पाठवावेत. त्यांच्याबरोबर ग्रंथही असावेत. लोकसाहित्य, लोकनाट्य, ललित कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, काव्यवाचन, कथाकथन यांसारखे उपक्रम बाराही महिने बृहन्महाराष्ट्रात चालतील अशी व्यवस्था करायला हवी. शासनानं त्यासाठी आथिर्क पाठबळ उपलब्ध करून द्यायला हवं. महाराष्ट्रात भाषा, संस्कृती यासाठी काम करणाऱ्या शासकीय समित्यांमध्ये एक तरी प्रातिनिधी महाराष्ट्राबाहेरचा घ्यावा. तो साहित्य संस्कृती मंडळातही असावा. विश्वकोषातही असावा. पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळातही असावा. बृहन्महाराष्ट्रातील माणूस अतिशय निष्ठेनं मराठी भाषा टिकवण्याचा प्रायत्न करतोय. आता गरज आहे, ती महाराष्ट्रानं त्याला विधायक साथ देण्याची.
मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांच्या प्रायत्नांना पाठिंबा देण्यासाठी. एखादा ठोस कार्यक्रम तयार होईल, यासाठी आजपासूनच प्रायत्न करावेत. शासन, समाज, साहित्य महामंडळ यापैकी कोणीही त्यासाठी पुढाकार घेऊ शकतं. महाराष्ट्र महोत्सवापासून ते लोककला, ग्रंथ, संस्कृती महोत्सवापर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरच्या बांधवांसाठी आयोजित करता येतील. मराठी भाषा महाराष्ट्रात टिकवण्याची आणि वाढवण्याची जशी गरज आहे, तशी ती महाराष्ट्राबाहेरही आहे. परिस्थिती कशीही असली, तरी भारतात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी एक प्रामुख भाषा मराठीसुद्धा आहे. हे सुखद वास्तव आहे. प्राश्न आहे तो, ते टिकवून ठेवण्याचा. वाढवत नेण्याचा. तिच्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचा… मला वाटतं, मी खूपच बोलत राहिलो. आपल्या भोवताली असलेल्या धगधगत्या आणि कोलमडणा-या सर्वच प्रकारच्या पर्यावरणाविषयी बोलत राहिलो. खूप खूप अपेक्षा व्यक्त करत आपल्याशी संवाद साधत राहिलो…मी नव्या युगाचा, नव्या जगाचा आणि जग बदलण्यासाठी प्रायत्न करणाऱ्यांचा एक प्रातिनिधी आहे. जग बदलावं, इथली व्यवस्था बदलावी याविषयी सर्वांत जास्त घाई मलाही आहे. बोलत राहू या. काही करत राहू या. सर्व प्राकारचे भेदाभेद ओलांडून जाण्यासाठी साहित्याची मदत घेऊ या. तसं साहित्य तयार करू या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.

Sunday, January 18, 2015

एक्सेल साठी सूत्रे

एक्सेल साठी सूत्रे 




Mathematical operators

Excel uses standard operators for formulas, such as a plus sign for addition (+), a minus sign for subtraction (-), anasterisk for multiplication (*), a forward slash for division (/), and a caret (^) for exponents. 
Illustration of mathematical operators
All formulas in Excel must begin with an equals sign (=). This is because the cell contains, or is equal to, the formula and the value it calculates.

Understanding cell references

While you can create simple formulas in Excel manually (for example, =2+2 or =5*5), most of the time you will usecell addresses to create a formula. This is known as making a cell reference. Using cell references will ensure that your formulas are always accurate because you can change the value of referenced cells without having to rewrite the formula.
Screenshot of Excel 2013
By combining a mathematical operator with cell references, you can create a variety of simple formulas in Excel. Formulas can also include a combination of cell references and numbers, as in the examples below:
Illustration of simple formulas

Tuesday, January 6, 2015

                            


"स्वग्रामे पूज्यते देवता,स्वराज्य पूज्यते राजा. 
स्वगृहे पूज्यते जेष्ठा,विद्वान सर्वत्र पूज्यते." 
खरोखर ही वाक्य ज्यांच्यासाठी खोटी ठरणार नाहीत असे.माणसाच्या कर्तृत्वाचा 
्पडदा ाकाचेसारखा पांढराशुभ्र यावर ज्यांचा विश्वास आहे आणि ज्यांच्यामध्ये ही 
उक्ती साकारली आहे असे आमच्या हदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री 
येरपूरवार साहेब.मी पाहिलेल्या अधिकार्‍यांत यांचं व्यक्तिमत्व खरोखर खूप 
वेगळं.कर्तव्य दक्ष्य आणि नेहमी शिक्षकाला प्रोत्साहन देनारे.ते आल्यापासून 
तालुक्यातील शिक्षणाची घडी व्यवस्थित बसली.दर्जा सुधारला.ते येण्यापूर्वी 
शिक्षणाचा दर्जा खालावलेला होता.पण त्यांनी दाखवून दिल की ग्रामीण भागातही 
हायटेक शिक्षण देता येऊ शकते.कार्यालयीन वेळेच्या नंतरही ते आपल्या कामात 
असतात.ते आल्यापासुन शिक्षकांच्या अनेक अडचणी दूर झाल्यात.त्यांनी कधीच 
अधिकार्‍यांसारखी अधिकारशाही वापरली नाही म्हणून ते असामान्यातील सामान्य 
अधिकारी ठरले. 
ते नेहमी म्हणतात. विधयार्थ्यांची ऊंची शिक्षकांच्या ऊंची पेक्षा जास्त असू 
शकत नाही .शिक्षकांची ऊंची समाजाच्या ऊंची पेक्षा जास्त असू शकत नाही.समाजाची 
ऊंची त्याला दिल्या जाणार्‍या शिक्षणापेक्षा जास्त असू शकत नाही.याचा अर्थ 
विध्य्यार्थी,शिक्षक,समाज,आणी शिक्षण यांचा एक परस्पर सह संबंध आहे. 


       "स्वग्रामे पूज्यते देवता,स्वराज्य पूज्यते राजा.
         स्वगृहे पूज्यते जेष्ठा,विद्वान सर्वत्र पूज्यते."
खरोखर ही वाक्य ज्यांच्यासाठी खोटी ठरणार नाहीत.माणसाच्या कर्तृत्वाचा पडदा                                                            काचेसारखा पांढराशुभ्र यावर ज्यांचा विश्वास आहे आणि ज्यांच्यामध्ये ही
उक्ती साकारली आहे असे आमच्या हदगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री
येरपूरवार साहेब.मी पाहिलेल्या अधिकार्‍यांत यांचं व्यक्तिमत्व खरोखर खूप
वेगळं.कर्तव्य दक्ष्य आणि नेहमी शिक्षकाला प्रोत्साहन देनारे.ते आल्यापासून
तालुक्यातील शिक्षणाची घडी व्यवस्थित बसली.दर्जा सुधारला.ते येण्यापूर्वी
शिक्षणाचा दर्जा खालावलेला होता.पण त्यांनी दाखवून दिल की ग्रामीण भागातही
हायटेक शिक्षण देता येऊ शकते.कार्यालयीन वेळेच्या नंतरही ते आपल्या कामात
असतात.ते आल्यापासुन शिक्षकांच्या अनेक अडचणी दूर झाल्यात.त्यांनी कधीच
अधिकार्‍यांसारखी अधिकारशाही वापरली नाही म्हणून ते असामान्यातील सामान्य
अधिकारी ठरले.
ते नेहमी म्हणतात. विधयार्थ्यांची ऊंची शिक्षकांच्या ऊंची पेक्षा जास्त असू
शकत नाही .शिक्षकांची ऊंची समाजाच्या ऊंची पेक्षा जास्त असू शकत नाही.समाजाची
ऊंची त्याला दिल्या जाणार्‍या शिक्षणापेक्षा जास्त असू शकत नाही.याचा अर्थ
विध्य्यार्थी,शिक्षक,समाज,आणी शिक्षण यांचा एक परस्पर सह संबंध आहे

Sunday, January 4, 2015

शालार्थ प्रणाली माहिती

शालार्थ : प्रवेश (LOGIN into SHALARTH)


 शालार्थ प्रणाली : प्रवेश 

  • web browser म्हणून windows explorer (7.० & above )किंवा firefox browser  वापरावा.  
  • web  address bing, google,yahoo,msn यामध्ये search करू नये. तो address bar मधेच टाकावा.अन्यथा window open होणार नाही.
  • खालील web address टाका.
 
website - www.shalarth.maharashtra.gov.in
              

  • त्यानंतर pop -up blocker अशी एक छोटी पट्टी वरती दिसेल. त्यावर click करून २ रा always allow......हा पर्याय निवडा.(वरच्या image मध्ये तो निवडला आहे.)
  • त्यानंतर खालील शालार्थ ची window दिसेल..                               
  • या Window मध्ये आपल्याला user name आणि password टाकावयाचा आहे.  
  • USER NAME  - प्रत्येक शाळेला स्वतंत्र ID आपल्या कार्यालयाकडून दिलेला आहे. या ID ला _AST जोडून शाळेचा USER NAME तयार होतो.
  • PASSWORD - प्रथम login साठी PASSWORD ifms123 हा  आहे.
  • टीप : प्रथम login केल्यानंतर PASSWORD CHANGE करण्याची Window येते. येथे PASSWORD बदलावा.
  • नवीन PASSWORD देताना खालील सूचनांचे पालन करावे.
 
  •  PASSWORD टाकून login करताना शक्यतो Virtual Keyboard चा वापर करावा जेणेकरून तुमच्या PC मध्ये Keylogger असेल तर तुमचा PASSWORD HACK होणार नाही. खालील स्क्रीन पहा. 
  • PASSWORD विसरल्यास.......?
  • PASSWORD शक्यतो व्यवस्थित लक्षात ठेवावा. पण तरीही तो विसरल्यास खालील पद्धतीने तो पुन्हा मिळवता येईल. 
  • FORGET PASSWORD या यावर click करावे मग खालील Window Open होईल. 
 
  •  तिच्यात तुमचा USER NAME टाकावा तो जर Valid असेल तर खालील Window Open होईल.
 
  •  यामध्ये जन्मदिनांक व एका गुप्त प्रश्नाचे उत्तर टाकावयाचे आहे. तो प्रश्न आणि उत्तर भविष्यात तुम्हाला पुन्हा PASSWORD विसरल्यास उपयोगी पडेल.
  • यानंतर Reset वर click केल्यास तुमचा PASSWORD पुन्हा ifms123 असा होतो.